गुरुवार, २८ मे, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी मुंबई (पूर्व ) गेट टुगेदर ९ मे २०१५ महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड पश्चिम वृत्तांत

        ग्रंथ तुमच्या दारी मुंबई पूर्व विभागाचे समन्वयक आणि देणगीदार यांच्यासाठी चे गेट टुगेदर ९ मे २०१५ रोजी सुविधा शंकर गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ (मुलुंड पश्चिम ) येथे संध्याकाळी ७.३० वाजता आयोजित केले होते.
या कार्यक्रमात व्यासपीठावर श्री. चंद्रशेखर वझे, श्री. विनायक रानडे, श्री. जयप्रकाश बर्वे आसनस्थ होते. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. स्मिता जोशी यांनी केले. सर्व प्रथम या योजनेची माहिती त्यांनी दिली. व त्यानंतर महाराष्ट्र सेवा संघाबद्दल माहिती ध्वनी चित्र फीत सादर केली गेली. श्री चंद्रशेखर वझे यांनी श्री विनायक रानडे यांचा सत्कार केला.
   श्री  चंद्रशेखर वझे यांनी भाषण केले. ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची सुरवात कशी झाली. त्यांनी विनायक जोगळेकर यांचे आभार मानले. या योजनेची सुरवात होण्यासाठी ते कसे सहाय्यभूत झाले ते सांगितले. त्यांच्या सहभागामुळे हि योजना १७ सेंटर पर्येंत वाढवता आली. असे हि सांगितले.
   त्यानंतर उपस्थित देणगीदार आणि समन्वयक यांचा सत्कार श्री जयप्रकाश बर्वे  यांच्या हस्ते झाला.

देणगीदार -    श्री. विद्याधर हरी गुर्जर ,श्री संजय आणि सौ स्मिता जोशी ,श्री विजय वझे

समन्वयक  -श्री. पेठे , श्री दत्त डोंगरे , सौ स्नेहल वैद्य , श्री भिडे . श्री खरे ,

सौ सुषमा पाटणकर (महाराष्ट्र सेवा संघ ग्रंथालय अध्यक्ष)

या सत्कारानंतर श्री दत्ता डोंगरे यांनी आपले मनोगत वक्त केले.या उपक्रमामुळे लोकसंपर्क वाढला त्यांच्याबद्दल सांगताना श्री विनायक जोगळेकर म्हणाले कि एवढी  जड पेटी त्यांनी स्वत:हून उचलून घेऊन गेले. हि फार कौतुकास्पद बाब आहे.श्री दत्ता डोंगरे असे हि म्हणाले कि मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी योग्य रित्या पार पडण्याचा प्रयत्न करीन. श्री. कुलकर्णी म्हणाले कि ते ह्या पेटीतील पुस्तके कार्यालयात घेऊन जातात आणि त्यांना तिथे हि छान प्रतिसाद मिळतो.
    श्री विनायक रानडे यांचे भाषण झाले. त्यांनी येथील प्रतिसादाबद्दल विनायक जोगळेकर आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. त्याशिवाय महाराष्ट्र सेवा संघ आणि श्री चंद्रशेखर वझे यांचे हि अभिनंदन केले. त्यांनी या योजनेची सुरवात कशी झाली याची थोडक्यात माहिती दिली आणि हि योजना ५ वर्षात देशात च नव्हे तर परदेशात हि पोचली आहे असे नमूद केले. त्यांनी विविध ठिकाणचे अनुभव सांगितले आणि ते म्हणाले कि हि योजना मुंबई पूर्व या विभागात अजून वृद्धिंगत होवो. त्याशिवाय माझे ग्रंथालय, माझे ग्रंथालय बाल विभाग या योजनेची हि माहिती त्यांनी दिली. ते असे हि म्हणाले कि पुढच्या वेळी हे   गेट टुगेदर अजून मोठ्या प्रमाणावर साजरे व्हावे त्यात समन्वयक , वाचक आणि देणगीदार हे हि सामील व्हावेत आणि त्या कार्यक्रमात वाचन विषयक कार्यक्रम सदर व्हावेत.
      त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ येथील श्री खरे यांनी नमूद केले कि वाचकांचे इ मेल , whatsapp किवा मोबाईल नंबर घेऊन त्यांना योग्य माहिती पुरवली जावी. श्री विजय वझे म्हणतात कि हे काम ऑनररी  करणाऱ्यांचा योग्य सत्कार व्हावा. या योजनेमुळे जी वाचनसंस्कृती वाढीस लागत आहे त्यामुळे यात काम करणाऱ्यांचे अभिनंदन. या च वेळी श्री डी व्ही कुलकर्णी यांनी सांगितले कि त्यांचा भाऊ जो इंग्लिश माध्यमातून शिकला होता तो आता या योजनेमुळे मराठी वाचन करू लागला आहे.
     या वेळी श्री दीपक बालगी - केटरर्स - महाराष्ट्र सेवा संघ यांनी देणगी देण्याचे आश्वासन दिले.
श्री चंद्रशेखर वझे यांनी त्यांच्या मित्रातर्फे एका पेटीच्या देणगीचा चेक श्री विनायक रानडे यांना सुपूर्त केला. या कार्यक्रमाची सांगता सौ स्नेहल वैद्य यांच्या पसायदानाने झाली
    हा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. या कार्यक्रमासाठी श्री विनायक जोगळेकर, श्री विजय वैद्य , सौ स्मिता जोशी आणि अन्य मान्यवर व्यक्तींचे सहाय लाभले.

https://youtu.be/A4vsbhkZ8ag  
                      

मंगळवार, २६ मे, २०१५

माझे ग्रंथालय बाल विभाग ठाणे लोकसत्ता २६मे २०१५

उषा भालचंद्र येवले -ब्रम्हांड ठाणे - पुस्तक पेटी ने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

     पुस्तके हि ज्ञान आणि माहिती देतात. नव्या पिढीवर संस्कारही करतात. तुम्ही कुठली पुस्तके वाचतात हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची खोली किती आहे याची कल्पना येते. तसेच पुस्तक वाचन हा मनासाठी उत्तम व्यायाम आहे. पुस्तक वाचनामुळे आपले अनुभव विश्व आपली कल्पनाशक्ती आणि शब्दसंपत्ती वाढते. आणि स्वतंत्र पणे विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन केल्याने माणसाची दृष्टी आणि बुद्धी बदलत असते. बुद्धीला परिपक्वता येते. खोचक पणाची वृत्ती लोप पावते. वाचनाने प्रज्ञा बुद्धी जागृत होते. मन शांत होते आणि वैचारिक शक्ती वाढते.
       अर्थात या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी प्रत्येक वेळेस हि पुस्तक खरेदी करणे शक्य नाही. मग यासाठी पर्याय म्हणजे वाचनालय मात्र जवळ पास वाचनालय नसल्यास त्याला पर्याय पुस्तक पेटी आणि हीच संकल्पना मनात ठेवून श्री व सौ जोशी यांच्या पुढाकाराने आमच्या ब्रम्हांड परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने पुस्तक पेटी या उपक्रमाची सुरवात केली गेली. १०० पुस्तकांची १ पेटी ३ महिन्यांनी बदलली जाते. या १०० पुस्तकांच्या एका पेटीत आत्मचरित्र, कथा कादंबऱ्या , प्रवास वर्णन व विविध वांड:मय प्रकारातील पुस्तकांचा खजिनाच असतो.
         १०० पुस्तकांची एक पेटी हि ब्रम्हांड मधेच स्थाईक झालेल्या सौ वैदेही जोशी यांच्याकडे दिली आहे. या पुस्तक पेटीचे सभासदत्व मायबोली महिला मंडळाच्या सभासदांना देण्यात आलेले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून एकदा बुधवारी संध्याकाळी ४-७ या वेळेत पुस्तके दिली घेतली जातात. या मुळे आम्ही सर्व महिला सभासद एकत्र येतो या पुस्तक पेटीत विविध लेखकांची तसेच विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असल्याने आमच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली. घराजवळ च असल्याने व वार्षिक अनामत रक्कम फक्त २०० रुपये असल्याने आर्थिक दृष्ट्या देखील परवडण्यासारखे आहे. त्यामुळे आमचा वाचनाचा छंद  चांगल्या प्रकारे जोपासला जात आहे. आणि याचा फायदा कुटुंबातील सर्व सभासदांना होतो. घरात पुस्तक बघून सगळ्यांची वाचायची इच्छा निर्माण होते. व सर्वचजण पुढच्या आठवड्यातील बुधवारची वाट बघतात.
         या पुस्तक पेटी द्वारे माझ्या ज्ञानात भर पडतेच आणि याचा सर्वात जास्त फायदा मला आमच्या मायबोली महिला मंडळाच्या मिटींगमध्ये होतो. या मिटिंग मध्ये दर महिन्याला "मी वाचलेले पुस्तक " यावर थोडक्यात भाष्य करायचे असते व त्या विषयावर चर्चा देखील होते.
अश्या प्रकारे या पुस्तक पेटीने माझी ज्ञानाची लालसा आणि जिज्ञासा वाढवली आहे. आता तर हि पुस्तक पेटी माझ्या रोजच्या सवयीचा भागच झाली आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम समाज बांधवाना दिलेला संदेश थोड्या फार प्रमाणात माझ्याकडून पाळला जातो. "वाचाल तर वाचाल"                               

उषा गायकवाड - पुस्तक पेटीने मला काय दिले, मित्तल पार्क रघुनाथ नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)

    "ग्रंथ हेच गुरु" "वाचाल तर वाचाल " अश्या वाक्यांचे संस्कार होत असलेल्या पिढीतील मी एक प्रौढ महिला. लहानपणापासून वाचनाचे जबरदस्त वेड. रोजच्या वर्तमानपत्र पासून कथा कादंबरी, चरित्रे, ललित लेख , वैज्ञानिक साहित्य अश्या सर्व प्रकारच्या वाचनाची आवड आज पर्येंत प्रयत्नपूर्वक जोपासली होती. त्यातच कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ग्रंथ तुमच्या दारी या योजने अंतर्गत वाचनासाठी आणखी एक दालन उघडते आहे समजल्यावर ताबडतोब नाव नोंदणी करून पुस्तक पेटीचा लाभ घेण्यास सुरवात केली .
        आजच्या धावपळीच्या जीवनात वाचानासाठी वेळ देणे जड जातेय . त्यातच कामाशी संबंधित वाचन नाईलाजाने करावेच लागते. एका जागी शांत पाने वाचन करणे दुरापास्त ! अश्या परिस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुस्तक सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करून सामाजिक ऋण फेडण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद!पुस्तक पेटीने वाचनातून माझे अनुभव विश्व समृद्ध केले. इथे नाना विषयावरील अनेक पुस्तक वाचावयास मिळाली. बाबू मोशाय यांचे सिने सृष्टीवरील अनुभव , स्टीव जॉब्स यांचे चरित्र वाचावयास मिळाले. इथेच मला मैक्झीम गोर्कींची "आई" भेटली. एस एम मुश्रीफ सारख्या पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या "हु किल्ड करकरे" मधून मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामागिल आणखी एक झगझगीत वास्तव समोर आले.
        डॉक्टर दातारांनी "दोन तात्या" म्हणजे स्वा. सावरकर व कुसुमाग्रज यांची नव्याने ओळख करून दिली. डॉक्टर फोंडक्यांच्या "सुगरणीच्या विज्ञानातून" वैज्ञानिक जग उलगडले तर प्रतिभा रानड्यांच्या "फाळणी ते फाळणी " माधून देशाच्या राजकारणाचे एक सत्य उघड झाले! इथेच मला वीणा गवाणकरांचा "कार्वर" भेटला. व एहेच पुलंच्या "गोतावळ्या" बरोबर परिचय झाला. जीवनाच्या अनेक पैलूचा उलगडा करणाऱ्या कथा व कादंबऱ्या यांचा खुराक तर भरपूर मिळाला.
        याशिवाय अनेक अप्रत्यक्ष फायदे होतेच. आजच्या बंद फ्लॅट संस्कृतीत परिचितांचा संपर्क कमी! पण  देवाण घेवाण करण्याच्या वेळात अनेक शेजारी पाजारी भेटू लागले. नवीन ओळखी होऊ लागल्या. सुख दु:खाची बोलणी होऊ लागली. आवडलेल्या पुस्तकांसंबंधी माहितीची देवाण घेवाण होऊ लागली.
       आमची पुस्तक पेढी चालवणारे डॉक्टर गोखले , श्रीमती गोरे अश्या सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींची ओळख झाली.
       अश्या अनेक गोष्टी पुस्तक पेढीने दिल्या. तरीही एक खंत जाणवते. आजची इंग्रजाळलेली टेक्नो सैव्ही तरुण पिढी मात्र या उपक्रमापासून   खूपच दूर आहे. मराठी साहित्य या पिढीसाठी अजूनही अनोळखी आहे . जोपर्येंत पुस्तक पेढी त्यांच्या पर्येंत पोचत नाही तो पर्येंत साहित्यातून होणारे संस्कार त्यांच्यावर होणार नाहीत आणि    तो पर्येन्त पुस्तक पेढीचे उद्धिष्ट १००% साध्य होणार नाही    

कुमुद अवचट मित्तल पार्क ठाणे ( पश्चिम) - पुस्तक पेटी ने मला काय दिले -(निबंध स्पर्धा )

   खूप दिवस वाटत होते कि कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे जी पुस्तक पेटी योजना सुरु झाली आहे तिच्याशी आपला संपर्क व्हावा . तो दिवस आमच्या मित्तल पार्क या सोसायटीत सुरु झाला आणि आपली जी मनापासूनची इच्छा होतीय ती पूर्ण होते आहे म्हणून खूप खूप आनंद झाला.
    उद्घाटन झालं आणि पुस्तक पेटी योजना सुरु झाली. या प्रकल्पाचे प्रणेते विनायक रानडे यांनी हि योजना सुरु करण्याची इच्छा हेतू हे स्पष्ट केले . त्यामागची त्यांची वाचनाला प्रवृत्त करण्याची तळमळ समजली . स्वत आर्थिक झीज सोसून कोणाकडून कोणतीही वर्गणी न घेता केवळ वाचनाची सवय वाचकांना लागावी या उद्देशाने हे वाचनालय सुरु झाले. मित्तल पार्क व प्रकृती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचा प्रारंभ झाला.
विनायक रानडे यांनी अगदी सोप्पा आणि ओघवत्या भाषा शैलीत आपले मनोगत मांडले. हा सगळा वाचनाचा परिणाम. अंग झोकून देऊन केवळ वाचनासाठी प्रवृत्त करणे हि त्यांची सेवाभावी वृत्ती या तरुणांमध्ये निर्माण झाली हे पाहून आम्हा ज्येष्ठांचे मन भारावून गेले.
         महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज हे खरोखर आपले सर्वांचे आदर्श आहेत, त्यांच्या सामाजिक कविता आजही आपल्या अनेकांच्या मुखोद्गत आहेत. आकाशातील एका ताऱ्याला सुद्धा कुसुमाग्रजांचे नाव हा त्यांच्या साहित्याचा केवढा मोठा गौरव आहे.
        विनायक रानडे यांच्या या उपक्रमाला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. पेटीतील पुस्तके हि अगदी उत्तम बांधणीची आहेत. विविध लेखकांचे , विविध साहित्य प्रकार , विविध विषय अशी हि पेटी अतिशय वैविध्य पूर्ण अशी आहेत. मुख्य म्हणजे हि पुस्तके आम्हाला हाताळायला मिळाली. मैक्झिम  गोर्कि चे आई, सावरकरांचे सहा सोनेरी पाने , पु ल , मिरासदार , चि. विं ची  विनोदी पुस्तके , शरद दळविंचे एकलव्य, नर्मदा परीक्रमेचे अनुभव लिहिलेलं भारती ठाकूर यांचे आगळे वेगळे पुस्तक , अनिल अवचट यांचे समाजातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहून केलेलं समाजासमोर मांडण्याचे धाडस त्यांच्या कथा व्यथा हे सर्व आम्हास वाचावयास मिळाले . खूप खूप समाधान झाले . ज्या पुस्तकांच्या प्रतीक्षेत आम्ही कित्येक दिवस होतो. ती पुस्तके निवांत वाचनासाठी प्रवृत्त करणारी , अंतर्मुख करावयास लावणारी आहेत.
          खरोखर खूप आनंद आणि समाधान मिळाले . पुस्तकांची निवड खूप विचारपूर्वक झालेली आहे. या वाचानालायामुळे आम्हाला इतर वाचनालये बंद करावीशी वाटू लागले आहे.
          आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तर हा अनुभव आनंदाचा होता. कारण आम्हाला वेळ भरपूर उपलब्ध आणि पुस्तकांच्या देवाण घेवानासाठी कोठे लांब जायला नको
           आमचा दृष्टीकोन व्यापक झाला. अनेकांची ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण वाढली. पुस्तकांच्या अभिप्रायावरून तर ते पुस्तक केव्हा वाचू अशी उत्कंठा वाढली. सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तकातील बुकमार्क ते इतके बोलके आहेत कि वाचनालये म्हणजे देवालये समाजातील लोकांची मनेच त्यात उतरली आहेत (म्हणजे पाने फाडू नये वगैरे ) पुस्तकाला लहान बाळाची उपमा उत्तमच बाळाप्रमाणे उत्तम संगोपन , हे मनाला खूप भावले.
       डॉक्टर गोखले हि इतकी महान व्यक्ती हे योजनेमुळेच समजले बुकमार्क बद्दल किशोर पाठक यांना धन्यवाद
       पुस्तक पेटी योजनेला धन्यवाद. अश्याच नवीन योजनांचा अवलंब इतरांनी त्यांच्या पासून घ्यावा, प्रेरणा घ्यावी आणि अश्या प्रकल्पांचे उदंड पीक येवो त्या दीर्घ काळ टिकाव्या हि ईश्वर चरणी प्रार्थना.             
  
              

सोमवार, २५ मे, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २६ मे २०१५ मुंबई

ग्रंथ निघाले . . . .  मुंबई २६ मे २०१५माझं ग्रंथालय , बालविभाग मुंबई येथे नविन  १२ ग्रंथ पेट्या . बालविभागाच्या ठाणे आणि मुंबई एकंदर ४० पेट्या , पुणे १६ तर नाशिक ९० ग्रंथ पेट्या . इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . अधिक माहितीसाठी संपर्क करा. विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान


शुक्रवार, २२ मे, २०१५

लक्ष्मी रवींद्र आचरेकर - पुस्तक पेटीने मला काय दिले. वर्तक नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)


पुस्तक पेटीने मला काय दिले? हा निबंधाचा विषय होऊ शकतो का? मला पडलेला प्रश्न तुम्हाला हि पडू शकला असता खरे ना? पण मी म्हणते या विषयावर एक शोध निबंध हि होऊ शकतो.
   खरेच मला या पुस्तक पेटीने काय दिले यापेक्षा किती दिले यावर लिहायला २५० शब्दाची मर्यादा खूप कमी आहे.
   वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण करताना खूप करायचे राहून गेले हि खंत मनात होतीच. दुपारचा उदासवाणा वेळ , संध्याकाळची सरती कातर वेळ सारच कसे हुरहूर अनामिक एकटेपणा जाणवणार.
    पण ग्रंथ तुमच्या दारी ची हाक कानावर आली. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पेटी आमच्या मंदिरात डेरेदाखल झाली. आणि मनाची आणि शरीराची हि तगमग शांत  झाली. किती आणि कोणते वाचू ?अलिबाबाची गुहाच जणू हाती आली. वांड:मायाचे विविध प्रकार गुण्या गोविंदाने पेटीतल्या १०० ग्रंथात विराजमान झाले होते. हि विविध ग्रंथ संपदा जणू सांगत होती हे अक्षर धन तुमच्यासाठी ज्या एका पुस्तक वेड्याने खुले केले ते स्वीकार. मनात सलणारा एकटेपणा मरगळ दूर करून पुन्हा एकदा जगाच्या ह्या पसाऱ्यात  मोकळेपणाने श्वास घे.
    " पुस्तका  सारखा दुसरा सच्चा मित्र नाही" हे थोरा मोठ्यांचे वचन लहानपणापासूनच पाठ होते. पण या मित्राची पाठ राखण उमेदीच्या काळात , लौकिक सुखाच्या शोधात कधी भासली नाही.पण काळाच्या ओघात कृतांत कर कमाल , ध्वज जर दिसो लागले याची जाणीव  देह मनावर उमटू लागली आणि खर्या मित्राची ओढ जाणवली
      या पुस्तक मित्राने मला जगाच्या कानाकोपऱ्यातील यात्रा घडवली. पृथ्वीच्या गोलात जग समाविष्ट झालेले पाहतो पण ह्या ग्रंथांनी देश परदेश तेथील संस्कृती, लोक, माणुसकी, निर्दयता यांचे समग्र दर्शन घडवले जगाच्या कोणत्या हि देशात जा प्रत्येक स्थळी माणसाचे माणूसपण मत्सर , हेवेदावे प्रेम मैत्री , ऋणानुबंध मानवी मनाचे तरल भाव विश्व   पराकोटीचा द्वेष   विस्मय चकित करणारे देश प्रेम सारखेच , फक्त भाषा वेगळी. पण त्यातूनच झिरपणारा माणुसकीचा एक सूक्ष्म निर्झर मला सापडला. "men are not born they are made" या वचनाचा अर्थ लावता आला. "अवघे विश्वची माझे घर" हा प्रत्यय पुस्तकाच्या प्रवास वर्णनातून मला   सापडला.
      तळागाळातला अति क्षुद्र समजला जाणारा माणुस त्याची न संपणारी दु :खे यातना आणि भ्रष्ट सत्तालोलुप धन कोडग्या माणसांची न संपणारी धन विषयक लालसा यातली सीमा रेषा यामध्ये मी चक्रासारखी फिरत राहिले हे जीव घेणे सत्य या माझ्या पुस्तक पेटीतल्या मित्रांनी निदर्शनास आणून दिले. मानवतेच्या कक्षा अधिकच गडद होत गेल्या. वय झाले म्हणून काय झाले ? समाजाकरिता करता येण्यासारखे खूप काही  आहे  हे त्या पेटीने मला शिकवले.
       पण त्याच बरोबर जीवन किती सुंदर आहे जीवनातील प्रत्येक क्षण हा अखरेच क्षण आहे असे समजून प्राप्त परिस्थितीत आनंद माना हा संदेश ह्या पुस्तक मित्रांनी दिला.     
        जीवन मरणाच्या सीमा रेषेवर उभी असणारे माझ्यासारख्या असंख्य स्त्री पुरुषांना हि पुस्तक रुपी पणती म्हणते तुमचे सर्व सुख दु;ख भावविश्व , आशा निराशा या पुस्तकांच्या प्रकाशात शोध
        हे दान मला पुस्तक पेटी ने दिले.  
                       

विभावरी दांडेकर पोखरण रोड नंबर -२ ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची " ग्रंथ तुमच्या दारी " हि जाहिरात वर्तमानपत्रात वाचली आणि माझ्या आनंदाला उधाण आले. एखाद्यापुढे पंच पक्वानांचे ताट ठेवावे असे वाटले. डोंबिवली हून ठाण्याला राहायला आल्यामुळे वाचनाचा आणि माझा संबंध संपल्यासारखाच झाला होता. नवीन शहर आणि नवीन जागा त्यामुळे कोणाशीही फारशी ओळख नाही. वाचनालये घरापासून फार दूर व गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे वाचन करणे जमत नव्हते. त्याच दरम्यान हि जाहिरात वाचल्यामुळे खूप आनंद झाला.पाठपुरावा करून फेब्रुवारी २०१२ मध्ये माझ्याकडे केंद्र सुरु झाले. त्या दिवशी कुसुमाग्रज च माझ्या घरी आल्यासारखे वाटले. आज ते आपल्यात नाहीत पण साहित्य रूपाने मरणोत्तरीही ते कीर्ती रूपाने जन मानसात आढळ स्थान मिळवून बसले आहेत. प्रत्येक पुस्तक पेटीत शंभर पुस्तके असतात व साधारणपणे चार महिन्यांनी पेटी बदलून दुसरी पेटी केंद्रात पोचोवली जाते.
       शंभर पुस्तकांच्या रूपाने साधारण पणे  नव्वद एक लेखक आपल्या घरी येतात.(वाचायला मिळतात). कारण काही लेखकांची दोन - चार पुस्तके असतात. पुस्तकांचे रूप देखणे असते. नवीन पुस्तके, पुस्तक बांधणी  करून (बाईंडिंग )योग्य ते शिक्के मारून पुस्तकाचे स्वरूप अतिशय सुंदर केलेले असते. पुस्तकांची निवड फार चोखंदळ पणे केल्याचे जाणवते. विविध विषय, जुन्या लेखकांप्रमाणे नवीन नवीन लेखक वाचकांच्या वाचनात कसे येतील ह्याचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळे ज्ञान , कला , विज्ञान , भाषा यांचे सखोल ज्ञान मिळते.  प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक निवडून वाचता येते.
       पेटीतील विविध पुस्तकांच्या वाचनामुळे मानवी भाव भावनांचे विलोभनीय दर्शन घडले. माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष त्यात आलेले यशापयश आणि अपयश पचवून झुंजून पुढील आयुष्याची वाटचाल अधिक नेटाने करण्याचा निर्धार जाणवला. अपंगत्वावर मत करून स्वत: आयुष्य  कसे घडवावे याचा वस्तुपाठ मिळाला. (रुद्रवर्षा - वसंत पागीकर) प्राक्तनात असलेली नोकरी व तिच्या अनुषंगाने मिळणारी वागणूक (फाशीचा साक्षीदार- ज्योती पुजारी) (झुलवा- उत्तम बंडू तुपे ) यांच्या कादंबरीवरून जोगती जोगतीणीच्या नशिबी आलेली फरपट पाहून मन व्यथित होते. अर्थात आनंददायी पुस्तके हि आहेत. त्यांच्या वाचनाने जीवनाच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडते. नावे आणि उदाहरणे तरी किती देणार. वि स खांडेकर , पु ल देशपांडे , साने गुरुजी , प्रवीण दवणे , रणजीत देसाई, रेखा बैजल, प्रकाश संत हेच नव्हे तर अनेक नव्या जुन्या लेखक लेखिकांच्या लेखनाने मनात सुख दु:खाचे कल्लोळ उभे केले. आणि समजले कि जीवन जे आयुष्य वाट्याला आले आहे ते जास्तीत जास्त चांगलेपणाने कसे निभावता येईल .  दुसऱ्याला त्रास न होता स्वतः अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कोणत्याही परिस्थितीत आनंदी, समाधानी राहून दुसऱ्यासाठी जगले पाहिजे. मी कोण ? त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून समाजोपयोगी काही चांगले करता येईल याचा विचार केला पाहिजे. हि शिकवण पुस्तक पेटीतील पुस्तकांच्या मुळे मिळाली. स्वतः उच्च आर्थिक स्थितीत असणे हेच जीवनाचे साफल्य आहे असे न मानता माझ्या बरोबरीने अनेकांचे जीवन सुखी आणि सुसह्य करण्याचा वसा घेण्याचा संदेश पुस्तक पेटीने दिला. भाषांतरित, रुपांतरीत पुस्तकांमुळे इतर भाषातील ज्ञान , चालीरीती वागण्याची पद्धत समजली. आपल्या मराठी भाषेची समृद्धी , श्रीमंती शतकानुशतके जुनी आहे. धार्मिक ग्रंथ , पुस्तके , कथा कादंबऱ्या, प्रवास वर्णने , आत्मचरित्रे , काव्य या सारख्या वांड:मय प्रकारांनी आपली भाषा समृद्ध आहे. त्यामुळे पुस्तके अनेक जण  वाचत च आले आहेत. पुस्तक पेटीची योजना नव्हती तेव्हा कोणी वाचत नव्हते असे नाही पण ज्या वेळी एखाद्या गोष्टीला काळाचे बंधन आले कि ती गोष्ट आपण वेगाने करतो. म्हणजे पुस्तक पेटी चार महिन्यांनी बदलणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा मी प्रयत्न करीन असा निश्चय करतो व तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. कायम स्वरूपी वाचनालयातील पुस्तकांबद्दल आपण एवढे जागरूक राहत नाही. वाचू! पुस्तके कुठे जाणार आहेत . ह्या विचाराने दिरंगाई होते. मिळणारा वेळ जास्तीत जास्त सार्थकी लावायला मी पुस्तक पेटी मुळे शिकले. चांगले ज्ञान, आचार विचार , आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती मला पुस्तक पेटीने दिली. आपलेच सर्वस्वी बरोबर आहे. दुसऱ्याचे चुकत आहे असा विचार न करता त्या त्या भूमिकेत जाऊन विचार करण्याची कुवत मला पुस्तक पेटीने म्हणजेच अनेक लेखकांनी दिली. अनेकांचे उत्तम लेखन ह्याचा विचार करताना किती लेखकांचा व त्याच्या लेखनाचा उल्लेख करणार? कारण ग्रंथ संपदा अगणित आहे. ह्या सर्व लेखकांचे ऋण फार मोठे आहे. एकच उल्लेख केला तर दुसरा तिसरा असे अनेकांचे उल्लेख राहिले याची मनाला चुटपूट लागते. त्यांच्याविषयी कृतज्ञता दाटून येते. लेखकांनी लिहित राहावे आणि व आपण ते वाचून त्यातले चांगले ग्रहण करून समृद्ध व्हावे असेच सारखे वाटत राहते. ह्या पेटीने मला शिकवले कि एखादे उत्तम काम करायचे ठरवले, अथक परिश्रमाची तयारी ठेवली , नेटाने काम करीत राहिले कि ते काम इतके चांगले व मोठे होते कि त्याची सुरवात करणाऱ्यालाहि ते आपोआप मोठे करते. नाशिक येथून सुरु झालेला हा प्रवास महाराष्ट्रातील अनेक शहरातून, गावातुन सुरु झाला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून तो महाराष्ट्र बाहेरही गेला. परदेशात हि विचारणा होत आहे. हि बाब किती कौतुकाची आहे नाही का.?हे सुरु झालेले काम पुढे नेण्यासाठी श्री विनायक रानडे व त्यांचे सहकारी अशी निष्ठावान माणसे हवीत. संधीचे सोने कसे करावे हे श्री रानडे यांच्या कडून शिकावे. आजारपणात अंथरुणावर पडून निष्क्रिय अवस्थेत असताना एवढे क्रियाशील काम त्यांनी सुरु केले. ते रेटले ते पुढे नेले हि गोष्ट खूप काही शिकवणारी आहे. या योजनेमुळे अनेक माणसे एकत्र आली. भेटीमुळे अनेक विचारांची देव घेव झाली , मैत्री जुळली. समविचारी मैत्रिणी ह्या पेटीमुळे मिळाल्या हा फार मोठा भाग्य योगच होय. या योजनेचा वेलू गगनावरी गेला आहे. आणि भाग्य म्हणजे तेथे कुसुमाग्रज नावाचा तारा अढलपणे  तळपत आहे. पुढील वाट अजून सोपी करण्यासाठी आपल्या आकाश गंगेसारख्या अनेक आकाश गंगा ह्या ब्रम्हांडात (विश्वात)आहेत ना ! त्यामुळे
 "sky is the limit " असे न म्हणता  आपण आणखी पुढे पुढे चालत राहूया. व ह्या प्रवासात हाच आशावाद मला पुस्तक पेटीने दिला. चांगले अधिक चांगले पुढे पुढे चालत रहाणे मग मार्गातील काटे कुटे आपल्याला कधीच टोचत नाहीत. कारण मनात भरून राहिलेला असतो आशावाद, जीवनाचे सोने करण्याची विजीगिषु इच्छा , इर्षा                                                 
          
      

मंगळवार, १२ मे, २०१५

सौ मनीषा ठाकूर देसाई - ठाणे - पुस्तक पेटीने मला काय दिले ( निबंध स्पर्धा २०१२)

    इतर सजीवांमध्ये व मानव प्राण्यात एक मुख्य फरक आहे. तो म्हणजे मानवाला बुद्धी आहे ज्यायोगे तो विचार करू शकतो, लिहू वाचू शकतो. म्हणूनच अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा भागल्यावर तो समाधानी राहू शकत नाही. त्याची बुद्धिची  भूक भागणे , करमणूक होणे सुद्धा तितकेच आवश्यक असते . त्यासाठी तो निरनिराळे छंद  जोपासतो , व्यासंग करतो.
     वाचन हा असा छंद आहे कि ज्याने करमणूक होते वेळ उत्तम प्रकारे सत्कारणी लागतो , बुद्धिला चालना मिळते व ते सुद्धा कुठल्याही प्रकारच्या खर्चिक  सुविधांशिवाय. त्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. पुस्तकाची उपलब्धता व आपली इच्छा बस.
      मला वाचनाची आवड लहानपणापासून होती. जे मिळेल ते अधाशासारखे वाचून काढायचे. ह्या छंदामुळेच केवळ तोंडओळख असणाऱ्या मैत्रिणीने मला ह्या उपक्रमाची माहिती दिली आणि मी चला जाऊन तर बघू म्हणून सुरवात केली आणि घट्ट पायच रोवला. जणू परतीची वाटच बंद. बर सुरुवातच अशी झाली कि आधीच्या आठवड्यात पेपर मध्ये माहिती वाचलेले पुस्तक कुठे मिळेल असे वाटत होते तेच हाती लागले आणि उत्साह खूपच वाढला.
     ह्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला कि मी माझ्या मुलीमध्ये वाचनाची आवड निर्माण करू शकले. माझ्या आवडीमुळे मला सतत असे वाटायचे कि घरातील इतरांनी  पण चांगले साहित्य वाचावे . ह्या पुस्तक पेटीचे सभासद झाल्यावर जादूची कांडी फिरावी तशी तिची वाचनाची आवड थोडी होती ती वाढली . माझ्याबरोबरच घरातील मंडळी सुद्धा पुस्तक बदलण्याच्या वाराची आतुरतेने वाट बघू लागली . पुस्तक आणल्यास छान आण  हं,आम्हाला पण वाचायचं आहे अशी फर्माईश  होऊ लागली. पुस्तकावर चर्चा होऊ लागली. वाचायला वेळ नसेल तर तूच वाचून महत्वाचे मुद्दे संग अशी मागणी होऊ लागली.
     पुस्तक पेटी ने फक्त वाचायला पुस्तके पुरवली नाही तर त्यापलीकडे जाऊनही खूप काही दिले. वाचनालयातून आपण एखादे वेळेस कधीच घेतली नसती अशी पुस्तके घेऊन वाचली गेली. व आपल्या फक्त आवडत्या साहित्यिकाची किवा विषयावरची पुस्तकेच वाचण्याचा दृष्टीकोन किती संकुचित आहे ते लक्षात आले.
     सरधोपटपणे चालणाऱ्या वाचनाला एक प्रकारची दिशा मिळाली . त्यावर विचार करून ते वक्त करण्याची सवय लागली. मनापासून आवड व व्यासंग असणाऱ्या  समानधर्मी व्यक्ती एकत्र आल्यामुळे वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, इतरांचे त्याबाबतचे विचार यांची देवघेव होऊ लागली. न वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती मिळून ती वाचण्याची उर्मी येऊ लागली . एखाद्या विषयावर असा वेगळा विचार होऊ शकतो, आपल्याला कसे सुचले नाही याची जाणीव होऊ लागली.
     अजून एक फायदा म्हणजे इथेच वाचक मंडळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे ठराविक वाचन त्यावर चिंतन , मनन होऊन त्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळाला.  पुस्तकांची नोंद ठेवली जाऊ लागली. व छोट्या ग्रुप मध्ये का होईना आपण आपले विचार व्यक्त करू शकतो असा विश्वास मिळाला.
      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रस असणाऱ्या , काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळू लागली. त्यांची ओळख होऊ लागली. त्यांचे विचार ऐकायला कार्य जवळून बघायला मिळाले. त्यांचे माहिती नसलेले गुणविशेष काही किस्से यांची भर पडली . आजूबाजूला चालणाऱ्या काही छोट्या मोठ्या संस्थांची सुद्धा माहिती मिळू लागली.
      वयाची किवा आपल्या कार्यक्षेत्राची चौकट ओलांडून अनेक समविचारी व्यक्तींशी ऋणानुबंध जुळून आला व नवीन मैत्रीचे धागे जुळले . त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन बदलण्यास अधिक सकारात्मक होण्यास हातभार लागला. अनेक अडचणींवर केलेली मात बघून नवी स्फूर्ती मिळाली. सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या.
     असा आगळा वेगळा उपक्रम असू शकतो त्याला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो तो सुद्धा इतक्या अल्पावधीत ह्याचा खूप आनंद झाला. जे वेड मजला लागले तुजला हि ते लागेल का ? असे म्हणण्याची गरज उरली नाही. कारण आपल्यासारखे किवा याहून जास्त वेडे ठरणारे आहेत हे बघून धन्य झाले.  ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुढची पिढी वाचेल का ? मराठी भाषेला व पुस्तकांना भवितव्य लाभेल काय ? असे प्रश्न हास्यास्पद आहेत कि काय असे वाटले. पुस्तकांचे आशादायी भवितव्य दिसू लागले.
     आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून अनुभव देऊन जाते . कधी बरा कधी वाईट  तसे ह्या पुस्तक पेटीच्या उपक्रमामुळेच स्वतःतील सुप्त विचारांना अधिक वाव मिळालाऽअप्ले विचार व्यक्त करायची शब्दात मांडण्याची सवय लागली जणू एक नवीन दलांच समोर अले. त्याचाच परिपाक म्हणजे आजचा लेखन प्रपंच. जाता जाता एव्ह्डेच म्हणते
     अनंत हस्ते कमलावराने, देता  घेशील किती दो करांने .                                            

सौ शर्मिष्ठा श्रीकृष्ण लेले - पोखरण गावंड बाग ठाणे - पुस्तक पेतीने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा  । समस्तांशी भांडेल तोचि करंटा  ।। समर्थ रामदास

      दिवसभर खेळत राहणे, आळश्या सारखे पडून राहणे हे बरोबर नाही दिवसात किती वेळ खेळावयाचे , किती वेळ अभ्यास करावयाचा , दूरदर्शन किती वेळ पहावयाचे या सर्वांचे नियोजन शिक्षक किवा आई वडील किवा आपण करावयास हवे . तरच जीवनात एक शिस्त येते. समर्थांचा यावर कटाक्ष होता.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर एकदा दुपारी दोन वाजता ग्रंथ वाचायला बस्ले. त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर रामचंद्र सकाळी नऊ ते पाच वाजेपर्येंत असे . तो पाच वाजता घरी जायला निघाला तेव्हा बाबासाहेब वाचण्यात गर्क होते. त्याने मी जाऊ का ? असे बाबासाहेबांना विचारले बाबासाहेबांनी खूण  करून जा असे सांगितले . दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता रामचंद्र कामावर आला. बाबासाहेब खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते. त्याला वाटले कि बहुतेक रात्री झोपून सकाळी पुन्हा वाचायला बसले असावेत. आपण कामावर आलेलो आहोत हे सांगण्यासाठी तो नुसते बाबासाहेब म्हणाला. तोच काहीश्या त्रासिकपणे बाबासाहेब त्याला म्हणाले तुला जा म्हणून सांगितले ना ? असे हे बाबासाहेब दुपारी दोन ते सकाळी नऊ वाजेपर्येंत वाचत च होते.
     लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांत मध्ये संक्षिप्त या सदरात श्री विनायक रानडे " ग्रंथ तुमच्या दारी " वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध   हि जाहिरात वाचली आणि त्वरित रानडे यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला . श्री रानडे यांनी योजनेची माहिती दिली. त्यासाठी ठाण्यातील प्रमुख सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानुसार सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधला  त्यांनी किमान ३५ लोकांचे नाव पत्ते दूरध्वनी क्रमांक अशी यादी अर्ज सोबत द्यावी व त्यानंतर आम्ही स्वत सोसायटीत येउन पाहू व मगच पेटी देऊ असे सांगितले. परंतु सध्या पेटी उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा मात्र श्री रानडे यांच्याशी भ्रमण ध्वनीने सतत पाठपुरावा केला त्यामुळे माझी कदाचित आंतरिक इच्छा जाणवली व त्यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०१२ रोजी १०० पुस्तकांची पेटी प्रदान केली.
       पुस्तक पेटी प्रदान करण्याच्या छोटेखानी समारंभात श्री रानडे यांनी त्यातील चार पुस्तके सर्वाना दाखवली. त्यावेळी ती पाहिल्यानंतर कोरी साडी हातात घेतल्यानंतर येणार सुगंध जसा मनाला सुखावतो तसाच भाव त्यावेळी प्रत्येक सभासदांच्या चेहऱ्यावर पाहून मलाही खूप आनंद झाला . प्रत्येक पुस्तक कोरे करकरीत प्लास्टिक मध्ये बंदिस्त जणू नवा साज ल्याले आहे. यात पु ल देशपांडे , व पु काळे , वि स खांडेकर , ह मो मराठे , डॉ विजया वाड , अश्या दिग्गजांची पुस्तके आहेतच पण अनुवादित तसेच नवोदित लेखकांची पुस्तके हि यात समाविष्ट आहेत.
       डॉ विजया वाड  यांनी कर्तुत्ववान स्त्रियांची ओळख करून दिली. ह मो मराठे यांनी मोठे मोठे राजकारणी , लेखक ,नट यांची भेट घडवून आणली .श्री श्रीनिवास गडकरी यांनी त्यांच्या "वेगळे काही" यातून   प्रसिद्धीस न आलेले परंतु जगावेगळ्या व्यक्तींची महती दाखवून दिली . गिरीजा कीर यांनी कारागृहातील कैद्यांची मन मोकळी ओळख करून दिली.
        या पुस्तक पेटी चे   ज्येष्ठ नागरिकच नव्हेत तर तरुणाई ने सुद्धा मनापासून स्वागत केले. मुख्यत्वे मोफत पुस्तक वाचनालय हि संकल्पनाच सर्वाना भावली. हे वाचनालय सुरु केल्याने सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या. तर बहुतांची अंतरे समजली . आज गावंड बागेत अथवा जवळ पास वाचनालय नाही त्यामुळे आज वाचनालयातून वाचक वर्ग लाभला. फक्त वाचनालय नाही तर मी व इतर ३-४ सभासदांनी वाचन व त्यावर चर्चा करावी असे हि विचार मांडले निवृत्ती नंतर सतत कुठल्या तरी कामात गुंतावे असा ध्यास या पुस्तक पेटीने पूर्ण केला. हि पुस्तक पेटी म्हणजे मेवा आहे. तो भरभरून सर्वांनी घ्यावा व त्यातील ज्ञान रस चाखावा व पुढे तो हि सर्वाना द्यावा हीच इच्छा. तरीही असे सांगावेसे वाटते कि यात ग्रामीण भाषेतील पुस्तके जास्त न ठेवता संगीत, संत वांङ्गमय , ललित लेख यासारखी पुस्तके असावीत . तसेच अच्युत गोडबोले,
डॉ जाखोटिया इ लेखक हि सहभागी व्हावेत. श्री रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि सौ रश्मी जोशी प्रमुख संचालिका यांना धन्यवाद.
        जो वाचेल तो वाचेल . जो वाचणार नाही तो वाचणार नाही हा नव्या युगाचा धर्म आहे. म्हणून समर्थांनी अफाट वाचन आणि थोडेसे लेखन रोज करावयास सांगितले आहे. आपण जे वाचन करतो त्यातील आपल्याला आवडलेला आणि महत्वाचा भाग लिहून काढावा.       

सोमवार, ११ मे, २०१५

सौ सुचेता यशवंत रानडे, देवदया नगर , ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

  नऊ वर्षापूर्वी आम्ही ठाण्यास शिवाई नगर भागात वास्तव्यास आलो. जुने मित्रत्वाचे संबंध तुटले नव्याने मैत्री जुळवणे, मन रमवणे सोपे नव्हते . पण मे महिन्याच्या सुट्टीत छोट्यांसाठी दोन वर्षे संस्कार वर्ग चालवले. महिला मंडळी सुरु केले. परंतु आजकाल या साठी सक्रिय सभासदांचा सहभाग मिळणे समाजाच्या अश्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे अवघड झाले व ते बंद पडले.
    आम्हा उभयतांची वये वाढत होती. शारीरिक स्थितीमुळे ठाण्याबाहेर व कधी कधी घराबाहेर जाणे  हि अशक्य होत असे . आम्हा दोघांना वाचनाची आवड आहे.  पुस्तक हा जवळचा सोबती वाटतो. शरीर दुर्बल असले तरी वाचन शक्य असते . हा मित्र आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधतो. मनोरंजन बरोबर अनेक अज्ञात विषयांची जवळून माहिती देतो , असामान्य व्यक्तीच्या जवळ नेतो व त्यांचे अलौकिक गुण ज्यांनी अनुभवले आहेत त्यांच्या साक्षीने आपल्यासमोर त्या गुणांना देदीप्यमान करतो. यशस्वी माणसांनी किती झगडून व जिद्दीने हार न मानता ध्येय साध्य केले हे सांगून आपले पूर्वीचे कष्ट व संकटे खरे तर या पुढे नगण्य होती हे लक्षात आणून देतो . शिवाय जर आवडले नाही , वेळ नाही , शरीर दमले तर मुकाट्याने आपले तोंड मिटून घेतो. आणि तसे करण्यासाठी आपल्या हातांना दुसऱ्यांच्या परवानगीची गरज लागत नाही. या मुळे  घरपोच पुस्तक देणाऱ्या वाचनालयाचे सभासदत्व घेतले . परंतु मोजक्या दहा बारा पुस्तकातून निवड करावी लागे . पुस्तक वाचून झाले नाही तर ठराविक दिवशी वाटप करणारा दारात आला तर पुस्तक परत न केले तरी अवघड अन्यथा नाईलाजाने पुस्तक बदलायचे ते हि बंद केले.
      पाच महिन्यापूर्वी योगायोगाने गावंड बाग येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन पेटी उपक्रमासंबंधी कळले .तिथे जाऊन संचालिका सौ लेले यांची गाठ घेऊन तपशीलवार माहिती मिळवली. लगेचच सभासदत्व घेऊन टाकले . ठराविक वेळी व ठरविक दिवशी पुस्तक बदलायचे , पंधरा दिवसांनी ते बदलावेचे लागते या मुळे वाचनात एक शिस्त आली असे अनुभवास आले. दर वेळेस चाळीस एक पुस्तकातून पुस्तक निवडायचे असल्याने निवडीस वाव मिळतो. विविध विषयावरची व विविध लेखन प्रकारातील पुस्तके समोर आल्याने मनपसंत निवड करून कृष्णाबाई सुर्वे यांचे " मी आणि मास्तर " हाती आले त्यांच्या कथेने कष्टानी अडचणींनी काळीज हेलावले. रवींद्र पिंगे यांच्या शतपावलीत कुमार गंधर्वांना भेटलो, महात्मा गांधीचे चरित्रकार श्री. डी. जी तेंडूलकर यांना जवळून जाणले. राम जगताप संपादित कर्ता माणूस मधल्या अप्रसिद्ध परंतु असामान्य व्यक्तींना परीचीतात सामावून घेतले. द. मा. मिरासदारांच्या हसणावळीत हसलो, वि. स. खांडेकरांचे पाढरे ढग कितीतरी वर्षांनी वाचले. काय नि किती जणांचा उल्लेख करू?
        शिवाय "समानशीलेषु  व्यसनेषु सख्यम या नात्याने इतर सभासद व संचालिकांशी मैत्री होत आहे. वाचन पेटी उपक्रमामुळे वाचनाचे आमचे उद्धेश सफल होत आहेतच .शिवाय मैत्रीचे वर्तुळ हि वाढत आहे. या सारखा आनंद कोणता? या उतारवयात एकटेपणा विसरायला लावणारी कोणतीही गोष्ट  आनंदाचीच व स्वागतार्ह असते ना?                    

             

लतिका कर्णे , लोकमान्यनगर ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले ( निबंधस्पर्धा २०१२)


  फार पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अमृत तुल्य ज्ञानेश्वरीतून आपणास प्राकृत भाषेचे पसायदान दिले. ज्यामुळे सर्व समाज जागृत झाला. ज्ञानाचा दिवा जनसामान्यात प्रकाशु लागला आणि भाषेची गोडी माणसाना रिझवू लागली. 
   लेखनाचे अनेक प्रकार पौराणिक कथा, अभंग, भारुड ओव्या , निरुपणे पण त्यातून मिळणारे अमौलिक ज्ञान माणसास आत्मभान देवून गेले.  ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम, नामदेव , मुक्ताबाई, रामदास अश्या अनेक संतानी हि साहित्याची गंगा समाजात पसरवली . त्यांनी सर्व लोकांना जगण्याची प्रेरणा दिली. त्यानंतरही अनेक प्रतिभासंपन्न लेखक - लेखिका यांचा ऒघ चालूच राहिला. त्यामध्ये राम गणेश गडकरी , प्र. के. अत्रे ,
 व. पु. काळे , पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर , शांता शेळके , इंदिरा संत , कवी ना. धो. महानोर, 
बा. सी . मर्ढेकर या सारख्या दिग्गजांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या सर्व साहित्य प्रकारात समाजाचे प्रतिबिंब अचूक दिसते. त्यांच्या साहित्यातुन आपल्या अनेक कला , संस्कृती , समाज , व्यक्ती याविषयी लिहिले व आपले मनोरंजन केले. 
    अश्या या समृद्ध साहित्याचा ठेवा सर्वांना सहज उपलब्ध व्हावयास हवा आणि हे शक्य झाले आहे पुस्तक पेटी या योजनेमुळेच. 
     आज सर्वसामान्यांना प्रत्येक पुस्तक स्वत घेऊन वाचणे शक्य नसते. परंतु नामवंत लेखकांची सर्व पुस्तके ज्यामधून आपणास अनेक साहित्यप्रकार हाताळता येतात . जसे कथासंग्रह , कवितासंग्रह , विज्ञान विषयक पुस्तके , आत्मचरित्र , कादंबरी व नाटके इत्यादी मला पुस्तक पेटीतून मला उपलब्ध झाले. या सर्व पुस्तकातून अनेक गोष्टींची प्रेरणा मिळते. जीवन सुसह्य करण्यासाठी त्याची मदत होते. जगण्याचा आनंद वाढवता येतो. पुस्तक वाचताना नकळत आपण त्यातील एक घटक बनून जातो. एका विश्वातून दुसऱ्या कल्पनाविश्वात नेण्याची किमया फक्त पुस्तकेच करू शकतात. 
      अनेक व्याधी , संकटे, चिंता यांनी त्रस्त झालेल्या लोकांना पुन्हा शांत व  स्थिर होण्यासाठी पुस्तके फार उपयुक्त आहेत. ती नैराश्य दूर करून नाव चैतन्य देतात. पुस्तकेच आपले मित्र असतात असे म्हंटले  तर वावगे ठरू नये. पुस्तक पेटी योजने मुळे आज समाजात जो संकुचितपणा झाला आहे तो हि कमी होण्यास मदतच मिळते कारण या निमित्ताने एकमेकांशी वैचारिक देवाण घेवाण होते. सुसंवाद साधला जातो. वेळोवेळी येणाऱ्या नवोदित लेखकांच्या साहित्याची हि ओळख होते. कारण याच लेखकांनी हा साहित्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. वाचाल तर वाचाल हि उक्ती खरे ठरवणाऱ्या पुस्तक पेटी मुळेच वरील सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत.                                   

सौ वेदेहि रामचंद्र जोशी - ठाणे - मला आवडलेले पुस्तक (निबंध स्पर्धा २०१२)


"फॉर हिअर टू  गो " हे अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे १९६० च्या दशकात मायभूमी सोडून दहा हजार मैलावरच्या परक्या देशात आपले नशीब आजमावण्याकरिता गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांची कथा आहे. 
  पैशाचे आकर्षण, अनुभव गाठी बांधण्याची जिज्ञासा , उच्च शिक्षणाची संधी अश्या अनेक कारणांनी लोक अमेरिकेत पोहोचले. अवघड जिणे , खाचखळगे, धोके जिद्दीने पचवले. भारतातील पारंपारिक संस्कृती आणि अमेरिकेतील राहणीमान, हवामान, खाणेपिणे हे दिवसरात्रीच्या फरकाएवढे वेगळे होते. 
   जलाशयाच्या पोटात दडलेली सुखदु:खे किनाऱ्यावरील लोकांना समजत नाहीत . परंतु अपर्णा वेलणकर यांनी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या थरातील कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे अवलोकन केले. देवापुढे निरंजन,  अगरबत्ती,कपूर लावला कि फायर अलार्म वाजू लागल्यावर काय करावे हे न कळणाऱ्या गृहिणी , आपल्या मुलांनी १२-१३ व्या वर्षी स्वताच्या बेडरूमला कडी लावून वावरणे पाहून आई वडिलांची होणारी कुचंबणा , शाळा कॉलेज मध्ये जाणारया  मुला मुलींना त्यांचे दिसणे भाषेचे शब्दोच्चार या मुळे  वाटणारा कमीपणा आणि अश्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष संवादातून मांडल्या आहेत .   
     पतीच्या मृत्युनंतर ६५ व्या वर्षी अमेरिकेत स्थाईक झालेल्या मुलाकडे जाऊन राहणाऱ्या आजीबाई नि ड्रायविंग करण्यासह सगळा बदल सहज स्वीकारला. संस्कृती रक्षणाच्या अमेरिकेत गेलेल्या लोकांच्या प्रयत्नांना सहाय्यभूत ठरावे  म्हणून श्री पटवर्धन यांनी आपला व्यवसाय सांभाळतानाच पौरोहित्याचे काम सुरु ठेवले .  असे अनेक जिद्दीने  राहणारे सामान्य परिवार होते. अमेरिकन उद्योगजगतात ज्यांनी नाव कमावले अश्या व्यावसाईकांशी संवाद साधून  त्यांचे अनुभव पुस्तकात अधोरेखित केले आहेत. 
     विमानाचे तिकीट काढण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ५० वर्षापूर्वी अमेरिकेत आलेले "सी एम सी रिअल्टी लिमिटेड " या शेकडो मिलिअन डॉलरची उलाढाल करणाऱ्या बांधकाम कंपनीचे मालक सुभाष गायतोंडे आहेत. अख्ख्या सिलिकॉन व्हालीत  ज्यांच्या नावाचा दबदबा आहे आणि ज्यांचा व्यवसाय व्हेन्चर कॅपीटालीस्ट आहे त्या डॉ  भालेराव यांनी १५००० हून अधिक कंपन्यांची स्थापना केली. अमेरिकन डिफेन्स डिपार्टमेंट व एअर फोर्स ची कामे ज्यांना मिळतात आणि उलाढाली नुसार अमेरिकेतील पहिल्या तीन कंपन्यामध्ये ज्यांची गणना होते ते मनोहर शिंदे आहेत. केमिर कंपनीचे मालक डॉ श्रीनिवास ठाणेदार असे अनेक महाराष्ट्रीयन लोक याच काळात अमेरिकेत आले.  परिस्थितीच्या नाविन्याशी झगडत, जुळवून घेत आपापली साम्राज्ये स्थापन केली  व व्यवसायात हि महाराष्ट्रीयन लोक कमी नाही हे सिदध केले 
    "फॉर हिअर टू  गो " हे पुस्तक वाचल्यावर परदेशात जाऊन स्थाईक झालेल्या लोकांच्या कष्टाची कदर न करता त्यांच्या मिळकतीवर डोळा ठेवणाऱ्या देशवासीयांच्या मनोवृत्तीचा विचार करणे भाग पडते . भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी म्हणून कसोशीने प्रयत्न करणाऱ्या परदेशस्थ लोकांना १९८० नंतर भारतीय सांस्कृतिक जीवनात पडणारा फरक थक्क करणारा होता. तरीही परदेशातील सांस्कृतिक  जीवन निकृष्ट हे ऐकावे लागत होतेच. बृहन्महाराष्ट्र मंडळ हि संस्था तेथील लोकांच्या मनातील उद्रेक बाहेर येण्याला त्यांना एकत्र  ठेवण्याला त्यांची सांस्कृतिक भूक शमविण्याला  आधार होती. 
        रमेश मंत्री यांचे " सुखाचे दिवस " (१९७५) व सुभाष भेंडे यांचे "गड्या आपुला गाव बरा "(१९८५) हि पुस्तके वाचनात आली. असणाऱ्या  वाचक जाणकारांकरिता २००७ साली प्रथमावृत्ती निघालेल्या   "फॉर हिअर टू  गो " या पुस्तकात घडणारे अमेरिका दर्शन निराळेच तरीही विलोभनीय आहे. टिकून राहण्याच्या , तरुन -तगुन  जगण्याच्या अपरिहार्यतेतून अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी अफाट कष्ट केले. विदेशी कंपन्यात नोकऱ्या करून गुणवत्तेने सन्मानाची पदे मिळवली. दूरदर्शी विचाराने व चिवट जिद्दीने संघर्ष करून बडे उद्योगपती बनले. 
     संपूर्ण जगाला एक "ग्लोबल व्हिलेज" करून टाकण्याची किमया माणसाला अवगत नव्हती त्याकाळी अनोळखी जगाच्या महासागरात आपले तरु लोटून देऊन ५० वर्षापूर्वी देशांतर करणाऱ्यांची हि कथा भाषेच्या गोडव्यासह , माहितीने परिपूर्ण आणि ओघवत्या लेखनाने अत्यंत मनोवर्धक झाली आहे.